केज प्रतिनिधी:
पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडलेली असतानाच ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गप्पेवाडीसह केज तालुक्यातील अनेक भागांत पिके करपण्याच्या मार्गावर असताना वारंवार होणारे लोडशेडिंग आणि वीजपुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. ‘पिके वाचवायची तरी कशी आणि आमच्या वीजेचा वाली कोण?’ असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने परिस्थिती झपाट्याने बदलली.
पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत असून अनेक शेतांमधील पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाची प्रतीक्षा करत असतानाच उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून पिके वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.
अनेक शेतकरी विहीर, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांवर अवलंबून आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्युत मोटारी चालवणे कठीण होत आहे. वीज येण्याची निश्चित वेळ नसल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जावे लागत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणेही शक्य होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
‘पिके करपतात, पण वीज कधी येणार?’
गप्पेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वीजपुरवठ्याच्या अनिश्चिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे पाऊस नाही, दुसरीकडे वीज नाही आणि तिसरीकडे शेतीचा वाढता खर्च अशी तिहेरी कोंडी शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.
खत, बियाणे, औषध फवारणी, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केल्यानंतर आता पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन आणि संबंधित वीज वितरण यंत्रणेने ग्रामीण भागातील परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाने तातडीने पाहणी करण्याची मागणी
पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने केज तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
तसेच शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता यावे यासाठी वीजपुरवठा सुरळीत आणि नियोजनबद्ध करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. पावसाची प्रतीक्षा, करपणारी पिके आणि लोडशेडिंगचा कहर यामुळे गप्पेवाडीसह केज तालुक्यातील शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे.
शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती तत्परतेने लक्ष देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

