digitalbeed.in

Globe’s most trusted news site

गप्पेवाडीत महावितरणची हालचाल तात्पुरती मलमपट्टी; कललेले खांब आणि जीर्ण तारा कायम?

गप्पेवाडीत महावितरणची हालचाल तात्पुरती मलमपट्टी; कललेले खांब आणि  जीर्ण तारा कायम?

बातमीचा धडाका! गप्पेवाडीत महावितरणची धावपळ; तात्पुरत्या दुरुस्तीने ग्रामस्थांमध्ये संताप कायम

बीड : केज तालुक्यातील गप्पेवाडी परिसरातील धोकादायक वीजतारा आणि कललेल्या वीजखांबांबाबतची बातमी प्रसिद्ध होताच महावितरण उपकेंद्र विडा प्रशासन अखेर खडबडून जागे झाले.

ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर तसेच प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न ऐरणीवर आणल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी गप्पेवाडीतील बाराभाई वस्ती परिसरात तातडीने काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती केली.

गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील वीजतारे खाली लोंबकळत होते, तर काही वीजखांब धोकादायक अवस्थेत कललेले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

विशेषतः पावसाळा तोंडावर आल्याने जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत काही तारा बांधणे, सैल झालेल्या लाईन दुरुस्त करणे तसेच धोकादायक भागात तात्पुरत्या उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले.

त्यामुळे ग्रामस्थांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले असले तरी ही कामे केवळ तात्पुरती मलमपट्टी असल्याची भावना नागरिकांमध्ये कायम आहे.“बातमी झाल्यानंतर प्रशासनाने हालचाल केली, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

तसेच, “महावितरण कर्मचारी यांनी काही दुरुस्तींचे अहवाल तयार केले असले तरी ते फक्त कागदावरच राहू नयेत. याआधीही अनेक वेळा तात्पुरते अहवाल तयार झाले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कायमस्वरूपी कारवाई झाली नाही,” असा आरोपही ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांनी संपूर्ण वीजलाईनची तातडीने तपासणी करून जीर्ण तारा बदलणे, कललेले खांब हटवणे आणि भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest Posts